महाभारताची कथा प्रचंड गुंतागुंतीची आहे. या महाकाव्यातील प्रत्येक पात्राला अंतत: दु:खं आणि नुकसान सोसावे लागते. १८ दिवसांच्या भीषण महायुद्धानंतर खरा विजय कोणाच्याच हाती लागला नाही. कुरुवंश जवळजवळ संपल्यात जमा झाला. एकसमयावच्छेदे करून, महाभारतकार असेही सांगतात, की तरीही जीवन जगायलाच हवे, वर्तमानाला धैर्याने सामोरे जायलाच हवे. नीती, तत्त्व, दुराभिमान, तडजोड, इत्यादींपासून सुटका नाही. निवड करणं महाकठीण असतं. तरीही निवड करायलाच हवी. जीवनाकडे बघण्याचा हा अस्तित्ववादी दृष्टिकोन आहे. सार्थनी म्हटल्याप्रमाणे मॅन इज कंडेम्ड टू बी फ्री, अॅण्ड फ्रीडम नेसेसरिली मिन्स मेकिंग चॉइस. अॅण्ड दि चॉइस इज टू बी मेड इन द प्रेझेण्ट. चित्र पूर्ण नसले किंवा निष्पत्ती स्पष्ट नसली तरी निर्णय घ्यावेच लागतात. म्हणूनच व्यवस्थापकांसाठी महाभारत एक उपयुक्त आणि अमूल्य ठेवा आहे.
आता आपण महाभारतातील दोन प्रसंगांकडे वळू या. युद्ध अटळ आहे. असे ठरल्यावर कौरव आणि पांडव या दोघांनी सेनापतींची निवड कशी केली? दुर्योधनाने आपल्या अधिकारात भीष्म यांची नेमणूक केली आणि मतभेद उफाळून आले. कर्ण म्हणाला, जोवर भीष्म सेनापती असतील तोवर मी युद्धा भाग घेणार नाही. युद्धिष्ठिराने मात्र श्रीकृष्णाचा सल्ला घेण्याचे ठरविले. सर्व जण एकत्रित जमले. श्रीकृष्णाने प्रथम ही चर्चा केली, की सेनापतीमध्ये कोणते गुण पाहिजे. त्याची बलस्थानं पाहिली पाहिजेत. त्यावर आधारून एक प्राथमिक यादी तयार करण्यात आली. प्रत्येक नावाबद्दल चर्चा झाली. शेवटी दोनच नावं उरली. एक अर्जुन आणि दुसरा धृष्टदन्मुम्न- द्रौपदीचा भाऊ. श्रीकृष्णाने कारणासहित आपली पसंती धृष्टदन्मुम्नसाठी सांगितली एका प्रकारे स्वॉट (रहडळ) अॅनालिसिस करण्यात आले. श्रीकृष्णाने ‘कन्सलटेटिव्ह प्रोसेस’ आणि ‘इनक्लुझिव्ह मेथड’ यांचा उपयोग निर्णय घेण्यासाठी केला. या निर्णयाला साहजिकच सर्वतोमुखी पाठिंबा मिळाला. दुसरा प्रसंग आहे, मद्र देशाचा राजा शल्य (नकुल आणि सहदेवचा मामा) दुर्योधनाच्या बाजूला जाण्याचा. तो पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी मद्र देशातून हस्तिनापुरास येण्यासाठी निघाला. वाटेत दुर्योधनातर्फे त्याची इतकी खातिरदारी करण्यात आली, की पाहुणचाराची परतफेड म्हणून तो कौरवांच्या बाजूला गेला. याच ग्रंथात, श्रीकृष्णाने अर्जुनाला (वाचा, व्यवस्थापकांना) दिलेल्या जगप्रसिद्ध सल्ला आहे. कर्मावर लक्ष केंद्रित कर, निष्पत्तीवर नको. लेखकांना खात्रीपूर्वक असं वाटतं, की व्यवस्थापकांना साहित्यातून मार्गदर्शन मिळू शकतं.
लोकसत्ता मधून साकार.
No comments:
Post a Comment